आजकाल प्रत्येक तरुण कुठल्यातरी कारणावरून भारताला शिव्याच घालत असतात आणि त्यातले अनेक जण भारत सोडून जायची भाषा बोलत असतात. पण जेव्हा भारत खरंच अत्यंत दयनीय स्थितीत होता तेव्हा मात्र भारत सोडून जाण्यापेक्षा बाहेरून शिक्षण घेऊन भारतात येण्याची आणि भारताच्या विकासासाठी ते शिक्षण उपयोगात आणण्याची आस अनेकांना होती. त्यात माझ्या मते पाहिलं नाव जर कोणाचं असेल तर ते स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचंच.आणि अशा माणसानं मातृभूमीचा विरह सहन न झाल्याने सागराशी साधलेला मुक्त संवाद म्हणजे ‘सागरा प्राण तळमळला’.यात सावरकरांच्या मनातील तळमळ, आर्तता तर अक्षरा-अक्षरात भरलेली आहेच. पण त्याबरोबरच अनेक गोष्टींचा ओलावा त्यात जाणवतो. पहिल्याच कडव्यात ‘भूमातेच्या चरणतला तुज धुता’ असं वाचताना मला आठवतो तो भारताचा नकाशा आणि भारतमातेचे हात-पाय धुणारे सिंधुसागर आणि बंगाल उपसागर तर पाय धुणारा हिंद महासागर आणि यांतून दिसतं ते सावरकरांचं भौगोलिक ज्ञान. प्रगाढपंडित सावरकरांच्या अफाट बुद्धिमत्तेची अशी छोटी-छोटी अनेक उदाहरणं या कवितेत सापडतात. ‘विश्वसलो या तव वचनी मी’ वाचत असताना जाणवतं कि आपण भारतीय पहिल्यापासूनच अतिसहिष्णू, उदारमतवादी. हीच आपली भूमिका आपल्याला दरवेळी नडते; पण आपण काही सुधारत नाही. अगदी आजसुद्धा हेच होताना दिसतं. ‘येईन त्वरे कथुनी सोडतो तुजला’ म्हणत असताना मला दोघांची आठवण होते. नाईलाज म्हणून मुलांना पाळणाघरात सोडून जाणारे आजचे पालक आणि मोठी झाल्यावर शिक्षणासाठी घरदार, देश सोडून परदेशी जाणारी आजची मुलं. सावरकरसुद्धा खरं तर शिक्षणासाठीच इंग्लंडला गेले, पण हे करत असताना आपण बॅरिस्टर होऊन भारतात परतायचंच हा दृढनिश्चय होता. जर भारत महासत्ता झालेला बघायचा असेल तर आजच्या तरुणांनी आपली भूमिका सोडून सावरकरांची हि भूमिका आत्मसात करायलाच हवी.‘हि फसगत झाली तैसी’ आणि ‘दशदिशा तमोमय होती’ या दोन्ही ओळींमध्ये अश्रूच भरले असावेत असं माझं मत; पण आपली तळमळ व्यक्त करताना सुद्धा पिंजर्यात अडकलेल्या पोपटासारखी किंवा जाळ्यात अडकलेल्या हरणासारखी स्वतःची झालेली अवस्था सावरकर ज्यावेळी सांगतात, तेव्हा त्यांचे शब्द त्यांच्या प्रतिभेची साक्षच देतात.‘जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा’ अहो, इथे आम्हांला स्वतःसाठी व्यवस्थित शिकायला जमत नाही आणि सावरकर म्हणतात कि जर मी घेतलेलं शिक्षण भारतमातेच्या उपयोगी पडलं नाही तर ते फुकट जाईल. धन्य ती राष्ट्रभक्ती!पुढच्याहि ओळींत भरतभूमीच्या ताऱ्यावरचं प्रेम ओथंबून वाहताना जाणवतं. त्याच प्रेमाच्या भरात भारताला वत्सल आमराई, नवनव्या फुलांनी रोज फुलणाऱ्या बहरणाऱ्या सुंदर वेली आणि छोटाच पण सुवासिक असणारा गुलाब असं सगळंच असणार्या फुलबागेची उपमा दिसते आणि भारताचं शब्दशः सौंदर्य वाचून आपण भारतीय असल्याचा सार्थ अभिमान मनात आल्याशिवाय राहत नाही.मला इथे मिळणाऱ्या राजवाड्यापेक्षा तिथे छोटीशी झोपडी जरी मिळाली तरी मी तिथे सुखात असेन आणि एखाद्या इतर राज्याचा राजा होण्यापेक्षा मी तिच्या जंगलात वनवास पत्करेन असं म्हणताना ‘...जन्मभुमीश्च स्वर्गादपि गरीयसी’ म्हणजे काय हे नव्याने सांगावं लागत नाही.‘तुज सरित्पते जी सरिता रे’ ही तर अफलातून काव्यात्मक कल्पना, सावरकरांच्या प्रतिभेची दुसरी साक्षीदार. नद्या या पर्वतातून सागराकडे धावत जातात आणि तिथेच राहतात म्हणून नदी हि वधू, पर्वत हा वधूपिता आणि सागर हा नवरदेव, नदीचा प्रियकर.आता मला तू भूलवू शकत नाहीस, मला तुझा डाव कळलाय आणि मला आई आठवतेय. अशावेळी जर मला माझ्या आईचा विरह सहन करायला लावशील तर तुला तुझ्या प्रेयसीची, तुझ्या पत्नीची शपथ. हि खरं तर एक काव्यकल्पना पण हि ओळ वाचत असताना प्रत्येक वेळी सागर खरोखरच मूर्त रुपात सावरकरांच्या समोर उभा असावा असं मला वाटत राहतं.पण अशी शपथ घालूनही जेव्हा समुद्र उत्तर देत नाही तेव्हा फेसाळलेल्या मिशांनी तो निर्दय जणू आपल्याला बघून हसतच आहे असं सावरकरांच्या आणि वाचकांच्या मानत येतं. तेव्हा मात्र सावरकर सरळ सरळ रोखठोक आणि धीटपणे समुद्राला विचारतात. ‘तू तुझे वचन का मोडतोयस ? तुझ्यावर आरूढ होऊन सर्व जग जिंकणाऱ्या इंग्रजांना घाबरतोयस का ? मग माझ्या आईला ती अबला आहे म्हणून फसवतोयस का? मला का छळतोयस ?’ इथे हि सावरकरांची अस्वस्थता शब्दाशब्दात साठलेली जाणवत राहते.आता मात्र सावरकरांचा बाणा, त्यांच्यातलं सळसळतं रक्त जाणवतं जेव्हा सावरकर म्हणतात ‘ब्रिटीशभूमीला घाबरणार्या घाबरटा माझी मतही अबला नाही.’याचं कारण सांगत असताना सावरकरांचं भारतीय संस्कृतीवरचं प्रेम जाणवतं. कारण भारतीय संस्कृतीमध्ये एक गोष्ट आहे कि अगस्ती ऋषी एका आचमनात संपूर्ण समुद्र प्यायले.सावरकर सागराला जणू धमकावतातच कि ‘अरे वेड्या, जर माझ्या आईला माझा विरह सहन झाला नाही तर ती तिच्या दुसर्या मुलाला, माझ्या अगस्ती नावाच्या भावाला सांगेल आणि तो पूर्वीसारखाच तुला पिऊन टाकेल’ पण हे सांगत असताना सावरकरांनी वापरलेली शब्दयोजना सावरकरांच्या प्रतिभेचं तिसरं उदाहरण. त्यांनी ‘पळी’ असा शब्द वापरला जो दोन प्रकारे घेता येतो, एक आचमनाची पळी आणि दुसरा म्हणजे क्षण. धन्य ते सावरकर, धन्य ती त्यांची प्रतिभा! असे हे महाकाव्य म्हणजे जणू आर्ततेचा, अस्वस्थतेचा, राष्ट्रभक्तीचा, देशप्रेमाचा, प्रतिभेचा, सृजनाचा अनोखा महासागरच ! या महासागरात पोहत असताना जर प्राण तळमळल्यावाचून राहिला तरंच नवल ! - श्रीसर्वेश्वर©
खूपच छान रिलेट केलं आहे दैनंदिन जीवन त्या कवितेशी, समरसून आले आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा