बुधवार, २२ जून, २०१६
आस्तिकता & नास्तिकता : महाचर्चा (भाग १)
मी असे आस्तिक बरेच पाहिलेत, ज्यांच्या श्रद्धा, निष्ठा ह्या त्यांच्यापुरत्या मर्यादित असतात. पण असे नास्तिकहि बरेच पाहिलेत जे इतरांच्या निष्ठा, श्रद्धा कशा खुळचट आहेत, हे त्यांना पटवून देऊन स्वतःच्या मार्गावर आणण्याच्या अट्टाहास करत असतो. आता हा स्वतःचे महत्त्व पटविण्यासाठी इतरांच्या श्रद्धा, निष्ठा वापरण्याचा प्रकार नव्हे का ?
मला एक सांग, हॉलीवूडमधले 'ऍव्हेन्जर्स' किंवा तत्सम काय ? बॉलीवूडमधल्या किंवा दाक्षिणात्य चित्रपटातल्या कुठल्याही अॅक्शनपटातले 'हिरो' काय ? हे सारे प्रेक्षकांना का आवडतात; कारण त्यांची अचाट, अमानवी ताकद/शक्ती/समर्र्थ्य !मग देवाचं अस्तित्व पटविण्यासाठी थोड्याशा अचाट, अमानवी कल्पनांना मूर्त रूप दिले तर बिघडले कुठे ?
शुक्रवार, १७ जून, २०१६
पु ल : एक अपूर्वाई
पु ल हि दोनच अक्षरे ! पण त्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या खळखळत्या हास्याचे प्रवाह साठलेले आहेत.
खरंतर हि पोस्ट लिहितोय ती पुलंच्या स्मृतिदिनाबद्दल, पण खरं सांगायचं तर हा माणूस आजही जिवंत आहे, आजही संबंध महाराष्ट्राला खळखळवून हसवतो आहे.
पु ल हि फार मोठी असामी असली तरीही त्यांना अक्खा महाराष्ट्र, अगदी माझ्या आजी-आजोबांपासून ते माझ्या भाच्या पर्यंत सारे बोलावतात ते 'भाई' म्हणून. कारण हि 'आपुलकी' त्यांनीच निर्माण केली आहे.
आपल्या लेखनातून वाचकांशी 'मैत्र' साधण्याची विलक्षण हातोटी पुलंमध्ये होती.
पु ल 'अष्टपैलू' होते हे मी म्हणणार नाही. कारण अष्टपैलू म्हटलं तर 'आठ पैलूंची मर्यादा येते. पण पुलंच्या व्यक्तिमत्वाला एवढे पैलू होते कि पुलंचं वर्णन करण्यासाठी 'अष्टपैलू' हा शब्दही थिटा पडेल.
तरीही पु ल ह्या हिमनगाचे आपल्याला समुद्रावर तरंगताना दिसणारे टोक म्हणजे त्यांचे विनोदि लेखन हे मान्य करायलाच हवं.
पुलंनी फक्त वाचकाला हसवलंच नाही, तर हसवता हसता दुःखावर, स्वभावातील त्रुटींवर नेमकेपणानं बोट ठेवणाऱ्या पुलंनी; हसवता हसवता वाचकाला अंतर्मुख केलं. पण हे करत असताना पुलंनी आपल्याकडून कधीही आगळीक घडू दिली नाही, त्यांनी कधीही एखाद्या शारीरिक व्यंगावर विनोद केला नाही. ह्यातच पुलंच्या संवेदनशीलतेचा दर्जा सिद्ध होतो.
पुलंनी मराठी साहित्यातील विनोदी लेखन, कथा, प्रवासवर्णने, भाषांतरे, कादंबऱ्या, नाटके, प्रहसने, व्यक्तिचित्रे, एकांकिका अशा विविधांगी क्षेत्रात आपल्या लेखणीने थैमान तर घातलेच पण त्याच बरोबर चित्रपट, नाट्यसृष्टी, संगीत अशा अनेक क्षेत्रात 'अपूर्वाई' घडवली.
आजीला आवडणाऱ्या 'इंद्रायणी काठी' पासून ते भाच्याला आवडणाऱ्या 'नाच रे मोरा' पर्यंत विविध बाजाच्या, वयोगटाच्या गाण्यांना पुलंनी संगीतबद्ध केले.
पु ल पेटीवर बसले कि त्यांच्या बोटांमध्ये 'जादू' शिरायचे आणि श्रोता हरपून जायचा.
त्याचबरोबर तबल्यावर बसलेले असताना ते कुठल्याही गतीत, कुठल्याही तालात आपले सामर्थ्य सिद्ध करायचे.
म्हणूनच त्यांचे जगणे म्हणजे एक प्रकारचं विविधांगी संगीतच होतं असं म्हटलं तरीही वावगे ठरू नये.
पुलंचं तिसरं क्षेत्र म्हणजे नाटक !!
अगदी लोकनाट्यापासून ते सामाजिक नाटकापर्यंत वेगवेगळ्या धरतीची, बाजाची नाटकं पुलंनी लिहिलीच पण अनेक नाटकांमध्ये स्वतः दिग्दर्शन आणि अभिनयहि केला.
पुलंच्या नाटकांतील 'फुलराणी' हे आजही जवळजवळ प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न आहे.
आपल्या विनोदी लेखनाचे सादरीकरण करत पुलंनी मराठी स्टँडप कॉमेडीचा पाया रचला.
पुलंनि महाराष्ट्रभर कथाकथनाचे कार्यक्रम करून महाराष्ट्रात कथालेखनातील एक वेगळा बाज रुजवला.
पुलंनी 'उपदेशपांडे' अर्थात सुनीताबाईंबरोबर केलेल्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमांमुळे बा सी मर्ढेकरांची 'नवकविता' महाराष्ट्राला समजली.
पुलंनी अनेक अनोखे कार्यक्रम नभोवाणी आणि दूरदर्शन वर सादर केले.
पुलंचं तिसरं महत्वाचं क्षेत्र म्हणजे चित्रपट !!!
पुलंनी अनेक चित्रपटांसाठी लेखन केले, अनेक चित्रपट संगीतबद्ध केले, अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
पण 'गुळाचा गणपती' हा सुप्रसिद्ध चित्रपट आजही 'सबकुछ पु ल' म्हणूनच ओळखला जातो. कारण ह्या चित्रपटात कथा, पटकथा, गीते, संगीत, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध भूमिका गाजवून पुलंनी त्यांच्यातला 'कल्लाकार' सिद्ध केला.
अशा ह्या कलंदर माणसाचा दूरदृष्टी हा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण !! पुलंच्या सावरकरांविषयीच्या आणि इतर भाषणांतून 'वक्ता दशासहस्त्रेषु' पु ल तर दिसतातच पण त्यांच्या ह्या हि गुणांची झलक पहायला मिळते.
अशा ह्या प्रचंड प्रतिभेच्या साहित्यिकाने अनेकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं. 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम कसे करावे ?' हे पुलंनी शिकवलं. म्हणूनच आत्महत्येला गेलेले अनेक जण पुलंचं साहित्य वाचून माघारी फिरले. हे सामर्थ्य होतं पुलंचं !!!
ह्या अशा असामी बद्दल मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
"अनंत हस्ते देता पुरुषोत्तमाने
किती रे घेशील दोन कराने ??"
- सर्वेश्वर
प्रवास
साधारण १७-१८ वर्षांपूर्वीचा असाच एक दिवस. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातला एखादा ! बहुधा पावसाची रिमझिम हि सुरु झाली असावी, कारण त्यावेळी पाऊस आत्ता एवढा बेशिस्त झाला नव्हता.
आणि अशातच गुलाबी रंगाचा हाफशर्ट, मरून रंगाची हाफ पँट, पाठीला रंगीत 'दप्तर', त्यात पाटी-पेन्सिल, गळ्यात अडकवलेली वॉटरबाग, आणि शर्टाच्या खिशावर रंगीबेरंगी हातरुमाल अशा अवतारात 'कोणीतरी' अंगणवाडीत पाय ठेवला. आणि आई निघून जाताच त्या बाळाच्या डोळ्यांतून मुसळधार बरसात सुरु झाली.
हळूहळू 'तो' मुलगा रमला, खेळण्यांतून 'प्ले थेरपी' अनुभवू लागा, बड्बडगीतांतून भाषा त्याला ओळखीची होऊ लागली, अंक-अक्षरे गिरवण्यात त्याला एकप्रकारची वेगळी मजा येऊ लागली आणि बघताबघता 2 वर्षे सरली.
पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी त्या चारभिंतीच्या शाळेतून 'त्या' मुलाची चार मजल्याच्या शाळेत बदली झाली. पण 'शिशु' असल्याने शिकवण्याची पद्धत साधारण तशीच होती. पण मित्र मात्र नवीन होते. त्याचबरोबर 'अंकलिपी' नावाच्या नव्या गोष्टीशी ओळख झाली. त्यामुळे त्यातही एक वेगळी मजा होती.
पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी तो 'शिशु' मोठा झाल्यावर त्याचा 'बालभारती'त प्रवेश झाला. आता मित्र तेच असले तरीही पाटी-पेन्सिल हा विषय पूर्णतः बाद करून दुरेघी वही आणि शिसपेन्सिल या वस्तू ओळखीच्या झाल्या. बड्बडगीते जाऊन छोट्यांचे धडे आणि कविता आल्या. सोबतच बाळबोध इंग्रजी आली. असेच दिवस जात राहिले.
पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी 'तो' मुलगा तिसरीच्या वर्गात जाऊन बसला.
दुरेघीची एकोळी वही झाली; चौकट वही हा विषय संपूर्णतः बंद झाला. परिसर अभ्यास हा विषय जाऊन सामान्य विज्ञान, इतिहास-भूगोल असे विषय आले. असेच दिवस जात राहिले.
पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी 'तो' गोंडस मुलगा प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश करता झाला. हळूहळू साहित्यिकांच्या कथा आल्या, कवींच्या कविता आल्या.
बाकीचे विषय आपली पातळी वाढवत राहिले.
आश्चर्य म्हणजे माध्यमिक शाळेच्या पहिल्याच वर्षात 'त्या' मुलाने प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यापुढे प्रत्येक वर्षात तो आपली हुशारी दाखवत राहिला. प्रत्येक वर्षी स्नेहसंमेलनात भाग घेत राहिला, कधी लेखक म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून. असेच दिवस जात राहिले.
पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी दहावीचा रिजल्ट हातात आला. ८०% मिळाले आणि 'त्या' मुलाची शाळा कायमची सुटली.
मग त्याने नव्या आयुष्यात पदार्पण केलं. 'कॉलेजगोअर्स' म्हणून 'त्या' मुलाचं प्रमोशन झालं. आधी कधी एकटाच बाहेर न पडलेला 'तो' रोज लोकल/बसने कॉमर्स कॉलेजला जाऊ लागला. एक वेगळं प्रकारचं आयुष्य जगू लागला. पण तरीही हे कॉलेज मराठमोळं होतं. असेच दिवस जात राहिले.
पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी १२वीचा रिजल्ट हाती पडला, ६७% नि पास झाला. नव्या अभ्यासक्रमात प्रवेश झाला. हे कॉलेज नवीन होतं. वातावरण मॉड होतं. सेमिस्टर पॅटर्न त्यामुळे बराच अभ्यास होता. पण 'तो' मुलगा मात्र अभ्यासापेक्षा इतर गोष्टीतच रमत होता. असेच दिवस जात राहिले.
पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी १५-१६ वर्षांपूर्वी शाळेत जायचं नाही म्हणून रडणारा 'तो' मुलगा शाळेत/कॉलेजमध्ये जायला मिळणार नाही म्हणून वाईट वाटून घेत माझ्यासारखाच बसला होता.
नव्हे, 'तो' मुलगा मीच होतो.
आता हा प्रवास पूर्णत्वास गेलाय, पण ह्या प्रवासाने माझं आयुष्य समृद्ध केलंय. ह्या प्रवासात जे जे माझ्या सोबत होते त्या साऱ्यांचे ऋण मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहणं मला अधिक प्रिय आहे.
-सर्वेश्वर जोशी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
