शुक्रवार, १७ जून, २०१६

पु ल : एक अपूर्वाई

पु ल हि दोनच अक्षरे ! पण त्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या खळखळत्या हास्याचे प्रवाह साठलेले आहेत.

खरंतर हि पोस्ट लिहितोय ती पुलंच्या स्मृतिदिनाबद्दल, पण खरं सांगायचं तर हा माणूस आजही जिवंत आहे, आजही संबंध महाराष्ट्राला खळखळवून हसवतो आहे.

पु ल हि फार मोठी असामी असली तरीही त्यांना अक्खा महाराष्ट्र, अगदी माझ्या आजी-आजोबांपासून ते माझ्या भाच्या पर्यंत सारे बोलावतात ते 'भाई' म्हणून. कारण हि 'आपुलकी' त्यांनीच निर्माण केली आहे. 

आपल्या लेखनातून वाचकांशी 'मैत्र' साधण्याची विलक्षण हातोटी पुलंमध्ये होती.

पु ल 'अष्टपैलू' होते हे मी म्हणणार नाही. कारण अष्टपैलू म्हटलं तर 'आठ पैलूंची मर्यादा येते. पण पुलंच्या व्यक्तिमत्वाला एवढे पैलू होते कि पुलंचं वर्णन करण्यासाठी 'अष्टपैलू' हा शब्दही थिटा पडेल.

तरीही पु ल ह्या हिमनगाचे आपल्याला समुद्रावर तरंगताना दिसणारे टोक म्हणजे त्यांचे विनोदि लेखन हे मान्य करायलाच हवं.

पुलंनी फक्त वाचकाला हसवलंच नाही, तर हसवता हसता दुःखावर, स्वभावातील त्रुटींवर नेमकेपणानं बोट ठेवणाऱ्या पुलंनी; हसवता हसवता वाचकाला अंतर्मुख केलं. पण हे करत असताना पुलंनी आपल्याकडून कधीही आगळीक घडू दिली नाही, त्यांनी कधीही एखाद्या शारीरिक व्यंगावर विनोद केला नाही. ह्यातच पुलंच्या संवेदनशीलतेचा दर्जा सिद्ध होतो.

पुलंनी मराठी साहित्यातील विनोदी लेखन, कथा, प्रवासवर्णने, भाषांतरे, कादंबऱ्या, नाटके, प्रहसने, व्यक्तिचित्रे, एकांकिका अशा विविधांगी क्षेत्रात आपल्या लेखणीने थैमान तर घातलेच पण त्याच बरोबर चित्रपट, नाट्यसृष्टी, संगीत अशा अनेक क्षेत्रात 'अपूर्वाई' घडवली.

आजीला आवडणाऱ्या 'इंद्रायणी काठी' पासून ते भाच्याला आवडणाऱ्या 'नाच रे मोरा' पर्यंत विविध बाजाच्या, वयोगटाच्या गाण्यांना पुलंनी संगीतबद्ध केले.
पु ल पेटीवर बसले कि त्यांच्या बोटांमध्ये 'जादू' शिरायचे आणि श्रोता हरपून जायचा.
त्याचबरोबर तबल्यावर बसलेले असताना ते कुठल्याही गतीत, कुठल्याही तालात आपले सामर्थ्य सिद्ध करायचे.
म्हणूनच त्यांचे जगणे म्हणजे एक प्रकारचं विविधांगी संगीतच होतं असं म्हटलं तरीही वावगे ठरू नये.

पुलंचं तिसरं क्षेत्र म्हणजे नाटक !!
अगदी लोकनाट्यापासून ते सामाजिक नाटकापर्यंत वेगवेगळ्या धरतीची, बाजाची नाटकं पुलंनी लिहिलीच पण अनेक नाटकांमध्ये स्वतः दिग्दर्शन आणि अभिनयहि केला.
पुलंच्या नाटकांतील 'फुलराणी' हे आजही जवळजवळ प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न आहे.

आपल्या विनोदी लेखनाचे सादरीकरण करत पुलंनी मराठी स्टँडप कॉमेडीचा पाया रचला.

पुलंनि महाराष्ट्रभर कथाकथनाचे कार्यक्रम करून महाराष्ट्रात कथालेखनातील एक वेगळा बाज रुजवला.

पुलंनी 'उपदेशपांडे' अर्थात सुनीताबाईंबरोबर केलेल्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमांमुळे बा सी मर्ढेकरांची 'नवकविता' महाराष्ट्राला समजली.

पुलंनी अनेक अनोखे कार्यक्रम नभोवाणी आणि दूरदर्शन वर सादर केले.

पुलंचं तिसरं महत्वाचं क्षेत्र म्हणजे चित्रपट !!!
पुलंनी अनेक चित्रपटांसाठी लेखन केले, अनेक चित्रपट संगीतबद्ध केले, अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
पण 'गुळाचा गणपती' हा सुप्रसिद्ध चित्रपट आजही 'सबकुछ पु ल' म्हणूनच ओळखला जातो. कारण ह्या चित्रपटात कथा, पटकथा, गीते, संगीत, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध भूमिका गाजवून पुलंनी त्यांच्यातला 'कल्लाकार' सिद्ध केला.

अशा ह्या कलंदर माणसाचा दूरदृष्टी हा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण !! पुलंच्या सावरकरांविषयीच्या आणि इतर भाषणांतून 'वक्ता दशासहस्त्रेषु' पु ल तर दिसतातच पण त्यांच्या ह्या हि गुणांची झलक पहायला मिळते.

अशा ह्या प्रचंड प्रतिभेच्या साहित्यिकाने अनेकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं. 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम कसे करावे ?' हे पुलंनी शिकवलं. म्हणूनच आत्महत्येला गेलेले अनेक जण पुलंचं साहित्य वाचून माघारी फिरले. हे सामर्थ्य होतं पुलंचं !!!


ह्या अशा असामी बद्दल मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
"अनंत हस्ते देता पुरुषोत्तमाने
किती रे घेशील दोन कराने ??"

- सर्वेश्वर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा