शुक्रवार, १७ जून, २०१६

प्रवास

साधारण १७-१८ वर्षांपूर्वीचा असाच एक दिवस. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातला एखादा ! बहुधा पावसाची रिमझिम हि सुरु झाली असावी, कारण त्यावेळी पाऊस आत्ता एवढा बेशिस्त झाला नव्हता.

आणि अशातच गुलाबी रंगाचा हाफशर्ट, मरून रंगाची हाफ पँट, पाठीला रंगीत 'दप्तर', त्यात पाटी-पेन्सिल, गळ्यात अडकवलेली वॉटरबाग, आणि शर्टाच्या खिशावर रंगीबेरंगी हातरुमाल अशा अवतारात 'कोणीतरी' अंगणवाडीत पाय ठेवला. आणि आई निघून जाताच त्या बाळाच्या डोळ्यांतून मुसळधार बरसात सुरु झाली.

हळूहळू 'तो' मुलगा रमला, खेळण्यांतून 'प्ले थेरपी' अनुभवू लागा, बड्बडगीतांतून भाषा त्याला ओळखीची होऊ लागली, अंक-अक्षरे गिरवण्यात त्याला एकप्रकारची वेगळी मजा येऊ लागली आणि बघताबघता 2 वर्षे सरली.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी त्या चारभिंतीच्या शाळेतून 'त्या' मुलाची चार मजल्याच्या शाळेत बदली झाली. पण 'शिशु' असल्याने शिकवण्याची पद्धत साधारण तशीच होती. पण मित्र मात्र नवीन होते. त्याचबरोबर 'अंकलिपी' नावाच्या नव्या गोष्टीशी ओळख झाली. त्यामुळे त्यातही एक वेगळी मजा होती.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी तो 'शिशु' मोठा झाल्यावर त्याचा 'बालभारती'त प्रवेश झाला. आता मित्र तेच असले तरीही पाटी-पेन्सिल हा विषय पूर्णतः बाद करून दुरेघी वही आणि शिसपेन्सिल या वस्तू ओळखीच्या झाल्या. बड्बडगीते जाऊन छोट्यांचे धडे आणि कविता आल्या. सोबतच बाळबोध इंग्रजी आली. असेच दिवस जात राहिले.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी 'तो' मुलगा तिसरीच्या वर्गात जाऊन बसला.
दुरेघीची एकोळी वही झाली; चौकट वही हा विषय संपूर्णतः बंद झाला. परिसर अभ्यास हा विषय जाऊन सामान्य विज्ञान, इतिहास-भूगोल असे विषय आले. असेच दिवस जात राहिले.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी 'तो' गोंडस मुलगा प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश करता झाला. हळूहळू साहित्यिकांच्या कथा आल्या, कवींच्या कविता आल्या.
बाकीचे विषय आपली पातळी वाढवत राहिले.

आश्चर्य म्हणजे माध्यमिक शाळेच्या पहिल्याच वर्षात 'त्या' मुलाने प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यापुढे प्रत्येक वर्षात तो आपली हुशारी दाखवत राहिला. प्रत्येक वर्षी स्नेहसंमेलनात भाग घेत राहिला, कधी लेखक म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून. असेच दिवस जात राहिले.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी दहावीचा रिजल्ट हातात आला. ८०% मिळाले आणि 'त्या' मुलाची शाळा कायमची सुटली.

मग त्याने नव्या आयुष्यात पदार्पण केलं. 'कॉलेजगोअर्स' म्हणून 'त्या' मुलाचं प्रमोशन झालं. आधी कधी एकटाच बाहेर न पडलेला 'तो' रोज लोकल/बसने कॉमर्स कॉलेजला जाऊ लागला. एक वेगळं प्रकारचं आयुष्य जगू लागला. पण तरीही हे कॉलेज मराठमोळं होतं. असेच दिवस जात राहिले.

पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी १२वीचा रिजल्ट हाती पडला, ६७% नि पास झाला. नव्या अभ्यासक्रमात प्रवेश झाला. हे कॉलेज नवीन होतं. वातावरण मॉड होतं. सेमिस्टर पॅटर्न त्यामुळे बराच अभ्यास होता. पण 'तो' मुलगा मात्र अभ्यासापेक्षा इतर गोष्टीतच रमत होता. असेच दिवस जात राहिले.


पुढे एखाद्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यातल्या अशाच एका दिवशी १५-१६ वर्षांपूर्वी शाळेत जायचं नाही म्हणून रडणारा 'तो' मुलगा शाळेत/कॉलेजमध्ये जायला मिळणार नाही म्हणून वाईट वाटून घेत माझ्यासारखाच बसला होता.
नव्हे, 'तो' मुलगा मीच होतो.

आता हा प्रवास पूर्णत्वास गेलाय, पण ह्या प्रवासाने माझं आयुष्य समृद्ध केलंय. ह्या प्रवासात जे जे माझ्या सोबत होते त्या साऱ्यांचे ऋण मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहणं मला अधिक प्रिय आहे.

-सर्वेश्वर जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा