शुक्रवार, २७ मे, २०१६

शिवरायांस पत्र (शिवजयंतीप्रीत्यर्थ)

प्रति,  आदरणीय शिवप्रभू,


आज साक्षात आपल्याला पत्र लिहून तसदी देतोय, याबद्दल क्षमस्व ! पण त्याचे काय आहे नं, तुम्ही आम्हांला जितके आदरणीय आहात, त्यापेक्षा जास्त पूजनीय, वंदनीय आणि प्रिय आहात. म्हणूनच हा पत्रव्यवहार करायची हिंमत करतोय. आपण आपल्या राज्यकारभारातून वेळ काढून हे पत्र वाचाल ह्याची आशा नव्हे, तर खात्रीच आहे. कारण तुमच्या राज्यात श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, ब्राम्हण-क्षुद्र असे कुठलेही भेद नव्हते.          

 ‘स्वराज्या’तल्या प्रत्येकालाच ‘आपलंसं’ असतं ते स्व-राज्य आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं कि आम्ही ब्रिटीशांपासून स्वतंत्र झालो असलो; तरीही अजून स्वराज्य आलेलं नाही. किंबहुना स्वराज्य असंच येत नाही, त्यासाठी मोठी खडतर परीक्षा द्यावी लागते ही शिकवणच आम्ही तुमच्याकडून घेतली नाही. आणि म्हणूनच खेदाने म्हणावं लागतं कि तुम्ही आम्हांला आदरणीय, पूजनीय आणि प्रिय असलात तरीही अनुकरणीय ठरला नाहीत.      

आज सर्वत्र महाराष्ट्रात तुमच्या नावांचा जयजयकार होतोय, अनेक शिवव्याख्याते तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रालाच तुमची नव्याने आणि खरोखर नवी ओळख देऊ बघतात. पण ह्या सार्या गाजवाज्यामध्ये मला ‘तुमचा महाराष्ट्र’ कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो.      

 आज तुमच्या जयंतीबद्दल अक्क्खा महाराष्ट्र आनंद व्यक्त करत असताना, तुमच्या जयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोषाचा पूर आलेला असताना मी खरच दुःखी आहे. आणि माझी खात्री आहे, आजच्या ह्या मराठा समाजाची  (म्हणजे मराठी समाजाची हं, नाही आज मराठा ही एक जात झालीय नं) झालेली दुरावस्था बघून तुम्हीही उद्विग्न झाला असाल, ह्यासाठीच मी आणि माझ्या ‘सिंहा’नी रक्त सांडलं का ? ह्यासाठीच जीवावर उदार होऊन मी आग्र्याहून सुटका करून घेतली का ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात सतत येत असतील.   

ज्यावेळी आपण आजच्या ‘राजे परत या’ वगैरे ह्या असल्या आरोळ्या ऐकत असाल; तेव्हा आपल्याला आपला ‘हर हर महादेव’ हा मंत्र आठवल्याशिवाय राहत नसेल. पण आम्ही तरी काय करणार ? आम्हालाही वाटतं, आपल्यासारखा एखादा तरी नेता जन्माला यायला हवा पण तो दुसर्याच्या घरात, नव्हे तर दुसर्या राज्यात. म्हणूनच आम्ही आमच्याच राष्ट्राविरुद्ध आरोळ्या देणाऱ्या कन्हैय्यासाठी तुमच्या पुण्यात रॅली वगैरे काढतो.  

इतकेच कशाला ? आपण आम्हांला शिकवण दिलीत ती परस्त्रीला मातेसमान मानण्याची. पण आपल्याच जयन्तीसाठी काढलेल्या रॅलीमध्ये शेजारून जाणारी मुलगी दिसली कि आमच्या गाडीचा स्पीड मंदावतो आणि आम्ही तिच्या ‘फिगर’चा अंदाज काढू लागतो. आणि तुमच्या स्मरणासाठी लावलेल्या स्पीकरमध्ये आम्ही एखाद्या ‘मुन्नी’ला बदनाम करतो.

एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी बदअंमल केला, तर आपण त्या पुरुषाचा चौरंगा करत. पण आज आमची शाळकरी मुलं आपल्याच गडांवर जाऊन बदअंमल करतात. अगदीच ती मुलगी नाही म्हणाली तर अॅसिड किंवा सुराही चालवला जातो.   

तुम्ही प्रत्येक जातीतल्या लोकांचा विचार त्यांच्या भल्यासाठी केलात, आम्ही मात्र आमच्याच भल्यासाठी त्यांचा वपर करतो.तुम्ही हिंदू धर्म सांभाळण्यासाठी जीवावर उदार होऊन भगवा ध्वज हाती घेतलात, पण आम्ही मात्र तुमचा भगवा ध्वज हाती घेऊन जाती-धर्माचंच राजकारण करतो. नाहीतर तुमच्याच हिंदु धर्मावर शिंतोडे उडवून स्वतःला सुधारित, विकसित,’पुरोगामी’ म्हणवून घेतो.         

आपण राज्यव्यवहारकोश काढलात, तो मायबोली मराठीच्या प्रचारासाठी. पण आज मराठी भाषेचे राजकारण करून स्वतःचा प्रचार करणारे मात्र स्वतःच्याच मुलांना आंग्लमाध्यमातील शाळेत पाठवतात.

  तुम्ही ब्रिटिशांना सुद्धा आपले ‘होन’ आणि ‘शिवराई’ वापरायला लावलेत, आम्ही मात्र आमच्या स्वार्थासाठी कोट्यावधी भारतीय रुपये परदेशी बँकांकडे सुपूर्द करतो.

आपण आमच्यापुढे प्रत्येक गोष्टीतला एक ‘आदर्श’ ठेवलात, आम्ही मात्र सैनिकांसाठी राखीव जागांवर ‘आदर्श’ बांधण्याची स्वप्नं बघतो.

तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी झटण्यापेक्षा आम्ही तुमचं स्मारक बांधायला झटतो. आम्ही तुम्हांला, तुमच्या विचारांचे पालन करण्याची गुरुदक्षिणा द्यायला हवी. तर त्याउलट तुम्ही तुमच्या विचारांमध्ये जिवंत असतानासुद्धा तुमचे स्मारक बांधतो.  

खरंच, केवढे कृतघ्न करंटे निपजलोय आम्ही ? महाराज आपण खरंच आमचं हे पत्रं वाचाल का ?

तुम्हांला आपलं म्हणण्याचा अधिकार आम्हांला आहे का ? आपण खरंच आमचे राहिलायत का ?                    

 महाराज, क्षमस्व ! खरंच माफ करा.

फक्त एकच सांगतो, हे सारं बदलण्याचा प्रयत्न मी माझ्यापासून सुरु करीन. पण फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत. मला तुमचे विचार अंमलात आणण्याचे चातुर्य आणि शौर्य द्या.                                                                                                                                       -तुमचाच मावळा, श्रीसर्वेश्वर©


बुधवार, १८ मे, २०१६

जरासा बचपन लौट आये ।

   लहानपण, बचपन, childhood हे आणि असे कुठल्याही भाषेतले समानार्थी शब्द ऐकले कि आपल्यापैकी प्रत्येक जण एक प्रकारचा नॉस्टॅल्जीया, किंवा पुलंच्या शब्दांत 'स्मरणसौख्य' अनुभवत असतो.
 
     या स्मरणरंजना च्या अवस्थेतून बाहेर पडत असताना आपल्याही नकळत आपल्या तोंडून उमटणारे वचन म्हणजे "तेहि नो दिवसा गतः।''
अर्थात "गेले ते दिन गेले"
बालपणावर बोलत असताना हमखास आठवणारा संत तुकारामांचा अभंग म्हणजे 'लहानपण देगा देवा' ।
आता संतशिरोमणी तुकारामांना ह्यात अपेक्षित असलेले लहानपण हे फार मोठ्या मुश्किलीने टिकवून ठेवावे लागते किंवा परत मिळते.
पण आपल्याला ह्या उक्तीतून असणार्या 'बालपण देगा देवा' ह्या अर्थावर बोलायचं झालं तर देव आपल्याला हे बालपण काही काळासाठी का होईना परत देत असतो असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये.
हे जर अधिक सुस्पष्ट करायचं झालं तर प्रत्येकानेच त्याच्या आयुष्यात अनुभवलेल्या एका प्रसंगाचं देता येईल.
जरा आठवा, तुम्ही एखाद्या ट्रेन/बसमधून कुठेतरी जात आहात. तुमच्या बाजूच्या सीटवर एखादं नव्याने आई-बाबा झालेलं जोडपं त्याच्या १-१.५ वर्षाच्या मुलाला घेऊन बसलं आहे.
मध्येच काहीतरी होतं आणि ते मूल रडू लागतं.
अशावेळी तुम्हीही तुम्ही कोण आहात ? कुठे आहात ? अशा प्रश्नांबरोबरच ते बाळ तुमच्या ओळखीचं आहे का ? असे अनेक प्रश्नांचं भान न ठेवता त्या मुला/मुली शी बोबडं बोलू लागता, त्याला हरप्रकारे खेळवण्या चा प्रयत्न करता.
असे बोबडे बोल हे त्या मुला च्या माध्यमातून देवाने तुमचं बालपण तेवढ्या वेळासाठी परत दिल्याचं लक्षण नव्हे का ?
माझं हे असं अनेकदा होतं.
परवा माझी बहिण तिच्या १.५ वर्षाच्या मुलाला घेऊन आली होती. येताना तिने त्या रंगीबेरंगी बडीशेप च्या गोळ्या आणल्या आणि त्या पाहून मला राहवलं नाही. मी त्या माझ्या भाच्यासाठी आणलेल्या असूनही मूठभर खाल्या.
त्याच्यासाठी कार्टून नेटवर्क लावलं होतं. तर त्यावर अनेक पिढ्यांमधल्या बच्चेकंपनीचे आवडते टॉम & जेरी त्याचा नेहमीचाच धिंगाणा घालत होते. ते पाहताना मीहि भाच्याइतकाच रंगून गेलो होतो. आणि अगदी एखाद्या लहान मुलाइतकाच निरागस दिसत होतो. (इति मातोश्री)
मध्यंतरी मी अशाच एका कार्टूनचं, माझ्या लाडक्या 'नॉडी'चं टायटल सॉंग रिंगटोन म्हणून ठेवलं होतं.
१ ते १.५ वर्षांपूर्वी एका पाहुण्यांकडे गेलो असताना मी त्या लहान मुलांच्या छोट्या खुर्चीवर बसलो आणि खुर्ची तुटली हे आत्ता लिहित असताना आठवलं.
अशा अनेक प्रसंगांमध्ये मी अजूनही एखाद्या लहान मुलाप्रमाणेच वागतो.
त्यामुळेच असेल कदाचित पण हल्ली तारुण्या मध्येही होणारी 'नावीन्यालर्जी' अर्थात 'आमच्या वेळी हे असं नव्हतं' वगैरे संवाद माझ्या तोंडून कधीच येत नाहीत.

©


मंगळवार, १७ मे, २०१६

जातिधर्म आणि बदलता समाज


मुळात जगातील कुठलीही गोष्ट, संस्था, अथवा व्यवस्था हि कालानुरूप बदलत गेली. आज समाजात जातीपातींचे उच्चाटन होण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि हे निश्चितच भारतीय समाजाची पाऊले शाश्वत विकासाच्या दृष्टीने पडत असल्याचे लक्षण आहे. 

पण कुठल्याही गोष्टीला विरोध करत असताना ती गोष्ट आधी मुळापासून समजून घ्यावी लागते. आणि जातीधर्माबद्दल विरोध व्यक्त करताना अनेक सुज्ञ दुर्दैवाने ह्या व्यवस्था मुळापासून समजून घेताना दिसत नाहीत. 

तर ह्या पोस्ट मध्ये जाती-धर्मांचा थोडासा इतिहास सांगावा लागेल असं दिसतंय. 

जाती-धर्माचा इतिहास सांगायचा झाला तर आदिम काळापासून, अगदी अश्मयुगापासून सुरुवात करावी लागेल.त्याकाळी प्रत्येक टोळीचा स्वतःचा धर्म, स्वतःची जात, स्वतःची दैवते आणि स्वतःची प्रतीके होती. 

त्यानंतर आगीचा आणि शेतीचा शोध लागला. मग ह्या टोळ्या त्या त्या प्रदेशात कायमच्या स्थिर झाल्या. ह्यातून समाजव्यवस्थेचा उदय झाला. आता ह्या समाजात राहणाऱ्या माणसांवर काही जवाबदार्या आल्या. उदा. आपल्या प्रतीकांचा सांभाळ करणे, आपल्या समाजाचे इतर समाजाच्या आक्रमणापासून संरक्षण करणे, आणि माणसांच्या दैनंदिन व्यवहारातील गरजा पूर्ण करण्याची जवाबदारी अशा अनेक. 

पुढे त्यातून वर्णव्यवस्था उदयास आली. हि वर्णव्यवस्था आणि आत्ताच्या जातीपाती ह्या समानच आहेत असे म्हणणार्यांना वास्तव माहित नसते, किंवा ते वास्तवाकडे कानाडोळा करतात. कारण ह्या दोन व्यवस्थांमध्ये सगळ्यात मोठ्ठा फरक आहे तो पारंपारिक व्यवसायपद्धतीचा ! वर्णव्यवस्थेमध्ये पारंपारिक व्यवसायपद्धती नव्हती तर प्रचलित जातीव्यवस्था हि मुळातच पारंपारिक व्यवसायपद्धतीच्या पायावर उभी आहे. 

पुढे बारा बलुतेदार पद्धती आली आणि तिनेच सगळ्यात मोठा गोंधळ घातला. आत्ता आपण ज्या व्यवस्थेला जातीव्यवस्था म्हणतो, ती खरतर बारा बलुतेदार पद्धतीच आहे. ह्या बारा बलुतेदार पद्धतीमुळे पारंपारिक व्यवसायपद्धती उदयास आली. मग आधीच धर्मांच्या आधारावर विभाजन झालेल्या समाजाचे पुन्हा एकदा (बलुतेदारी पद्धतीतील) जातींच्या आधारावर विभाजन झाले. आणि त्यातून आत्ताच्या जाती-पातीतील भेदाभेद तसेच इतर समस्यांनी डोके वर काढले. 

शिवरायांच्या काळातच खरतर बारा बलुतेदार पद्धतीला हादरे बसायला लागले होते. अठरा पगड जातीचे लोक महाराजांच्या मावळ्यांमध्ये समाविष्ट होते. पुढे तर बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांचे वंशज मराठा साम्राज्याचे पेशवे झाले. १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर आपण भारतीयांनी बारा बलुतेदार पद्धतीला तिलांजली दिलीय. आज प्रत्येकाला आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. पण तरीही आपण बारा बलुतेदार पद्धतीची पाळेमुळे आपल्या समाजातून पूर्णतः उखडू शकलो नाही हे आपलं दुर्दैव आणि अपयश म्हणावं लागेल.  

#ह्या_बारा_बलुतेदार_पद्धतीला_माझाही_विरोधच_आहे

पण आता जातीव्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडून येणे अनिवार्य आहे.  


आपण आत्ता भारतीय म्हणून एकत्र राहतोय. ह्या भारतिय समाजात राहणाऱ्या प्रत्येकावर समाजघटक म्हणून काहीनकाही जवाबदारी आहे.
त्यातूनच नव्या जातीव्यवस्थेचा उदय व्हायला हवा. पण ह्या जातीव्यवस्थेच्या जवाबदार्या असल्या तरीही त्या प्रत्येकाला अनिवार्य असू नयेत. प्रत्येकावर त्या पूर्ण करण्याचे बंधन लादले जाऊ नये. स्पृश्यास्पृश्यता आणि अमंगल भेदाभेद केला जाऊ नये.

पण नव्या जातिव्यवस्थेचा उदय म्हणजे नेमकं काय ?
पूर्वी समाजाचे संरक्षण करणारी क्षत्रियजात होती. आज भारतीय सैन्य भारताच्या सीमांवर डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करत आहेत. आता भारतीय सैन्याशिवाय आपण काही वेळापुरते तरी सुरक्षित राहू का ?
भारतीय सैन्य हे नव्या जातीचे एक उदाहरण झालं. अशा अनेक जाती उदयास यायला हव्यात. ज्या केवळ व्यवसायापुरत्याच मर्यादित असाव्यात. जीवनाच्या इतर क्षेत्रांना लागू पडू नयेत. 

थोडक्यात काय तर 'जगा आणि जगू द्या' ह्या पायावर ह्या नव्या जातिव्यवस्थेची उभारणी झाली पाहिजे.  


- वैचारिक सर्वेश्वर

शनिवार, १४ मे, २०१६

‪बातमी नागराज मंजुळे यांची आणि माझी भूमिका‬

मुळात नागराज मंजुळे हा एक दिग्दर्शक आहे. समाजातल्या अनिष्ट रूढींवर प्रहार करणारा आहे.
म्हणून त्याला वैयक्तिक आयुष्य नसावं ??
आता तुम्हाला माझी कालची पोस्ट आठवली असेल.
पण हे असं होण्यामध्ये प्रसारमाध्यमांतील वाढती स्पर्धा आणि वाचक/प्रेक्षक टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आजचे पत्रकार कुठल्याही मार्गाचा अवलंब करायला तयार असतात. त्यातलाच एक म्हणजे झगमगाटातल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या अंगावर शिंतोडे उडवणे. आणि हाच प्रकार काल नागराज मंजुळे यांच्याबाबतीत घडला.
मुळात हि प्रसारमाध्यमे वाचक/प्रेक्षकांच्या डोळ्यांवर अंधविश्वासाचा चष्मा लावण्यात यशस्वी झाली आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये आलंय म्हणजे खरंच असणार हे कुठल्याही प्रकारचा सारासार विचार न करता ठरवून आपण मोकळे होतो. आणि ह्यामुळे प्रसारमाध्यमांतून उगवलेल्या नव्या रोपाचं पिक सोशलमिडिया वर सर्वत्र येतं. हेच काल पुन्हा एकदा ह्या प्रकारामुळे अनुभवास आलं.
आता मुळात मला ह्या प्रकाराबाबत काय वाटतं ??
मुळात काडीमोड किंवा डिव्होर्स हि काही साधीसुधी गोष्ट नाही, कि मनात आलं आणि लगेच प्रत्यक्षात आणलं.
तर हि एक सनदशीर/कायदेशीर प्रक्रिया आहे, जी घडून येण्यासाठी दोन्ही बाजूंनी संमती अनिवार्य असते.
जर नागराज मंजुळे यांच्या पत्नीस डिव्होर्स मान्य नव्हता तर तो झालाच कसा ??
ह्याचा अर्थ जेव्हा डिव्होर्स झाला तेव्हा त्यांची संमती होती.
त्यामुळे दिनांक १० नोव्हेंबर २०१४ रोजी सुनिता लष्करे-मंजुळे आणि नागराज मंजुळे यांचं वैवाहिक नातं भारतीय राज्यघटनेनुसार संपुष्टात आलं आहे आणि त्या वेळी सुनीता लष्करे यांना सनदशीर मार्गाने मिळणारी ७००००० ची पोटगीसुद्धा देण्यात आलेली आहे.

मग दोघेही सनदशीर मार्गाने स्वतंत्र झाले असताना आता परत हि तक्रार करण्याची गरज काय ??

तर नागराज मंजुळे यांना आता मिळालेलं यश !!!
त्यांना मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा ह्यासाठी करत नसल्याचं सुनिता लष्करे जरी म्हणत असल्या तरीही हे ह्यासाठीच करण्यात येत आहे हे शहाण्यांना लगेच समजेल.
आणि राहिला प्रश्न नागराज मंजुळे यांची गर्लफ्रेंड(??) गार्गी कुलकर्णी हिचा !!
तो सर्वस्वी नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तेव्हा उगाच प्रसारमाध्यमे हाईप करत असलेल्या बातम्यांकडे लक्ष देण्यापेक्षा इतर अनेक महत्वाच्या घडामोडी आजूबाजूला घडत आहेत.

- समीक्षक सर्वेश्वर