भारद्वाज आणि संजय : एक प्रेमकथा 
"का रे भारद्वाजा ?;
एरवी गवतात लपून छपून मला निरखत असतोस, तुझी मान तर सारखी टुकू-टुकू हलत असतेस मग आज सकाळीच त्या झाडावर असा शांत का बसलायस ??
लहानपणापासून तुझी कुकडूक ऐकत आले, लहानपणी तुझ्या आवाजाला मी प्रत्युत्तर द्यायचे, मग शिवाशिवीचा खेळ चालायचा आपला !
मग हळूहळू मोठी होत गेले, कॉलेजला गेले तसतसा तो वेडेपणा वाटायला लागला कारण नवीन क्षितिजे खुणावू लागली होती.
मग शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली आणि मी घरी आले, घरी आल्या आल्या संजू, राजू, मिनू, निनु माझ्याभोवती नाचू लागले आणि नाचता नाचता गाऊ लागले, "ताईचं लग्न, ताईचं लग्न" 
अप्पा खुश होऊन सांगत होते, "बाळा नाव काढलंस" खरंतर लहान असल्यापासून 'नकुशी' झालेले मी, आज काय असं घडलं ?, तर पुण्यातल्या रावसाहेब देशपांड्यांनी स्वतः घरी येऊन त्यांचा एकुलता एक मुलगा, संजयसाठी मला मागणी घातली होती. 
रावसाहेब म्हणजे मोठं प्रस्थ! लक्ष्मी आणि सरस्वती ज्यांच्या घरी पाणी भरते असं लहान असल्यापासून ऐकलं होतं, त्या रावसाहेबांनी आपल्या 'नकुशी'ला मागणी घालणं हा अप्पांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता.
पुण्यात मोठ्ठा वाडा, भोसरीमध्ये लांब-रुंद शेतजमीन, नोकर-चाकर, असं घरचं सारं तर ठीक होतच पण उंच, अंगापिंडाने मजबूत, देखणा, गोरा-गोमटा, पिळदार मिश्या असलेले संजय, लग्नाला माझा विरोध असण्याची काहीच गरज नव्हती. अर्थात मी संजयना लग्नापूर्वी फक्त फोटोत पाहिलं होतं.
 
नाही म्हणायला मागणी येण्यापूर्वी, मी पुण्यात आत्याकडे राहत असताना आत्येभावाच्या मित्रांबरोबर संजयहि आले होते आणि ते गप्पांमध्ये कमी मला पाहण्यातच जास्त रंगले होते, आणि ते आत्येभावाच्या इतकं लक्षात आलं कि तो त्यानंतर मला 'श्रीमती संजय'च म्हणू लागला.
होता-होता लग्न झालं, एक महिना सुखात आणि सुखस्वप्नं रंगवण्यात गेला आणि सैन्यात कॅप्टन असलेल्या संजयना सीमेवर रुजू होण्याचा आदेश आला.
संजय गेले आणि पुन्हा एकदा पदरी उपेक्षा-अवहेलना-टोमणे-दुःख यांची ढग आली. कारण तेव्हा गेलेले संजय आजही परतले नाहीत. सुरुवातीला आमचं प्रेम पत्रातून वाढत होतं, पण काही दिवसांनी सारंच संपलं.
त्यांचाच बटालियन मध्ये असणाऱ्या आतेभावाच्या सांगण्यानुसार ते कदाचित पाक सैन्याकडे कैदेत असतील. तर केंद्र शासनाने त्या युद्धातल्या मृतांच्या यादी त्यांचे नाव घातले.
कुणी कै तर कुणी कै सांगत राहिले, घरी सगळेच संजयच्या शोकात बुडाले. 
पण मी आज पर्यंत कधीच संजयसाठी रडले नाही, आजहि सधवेसारखीच राहते, कारण मला माहितीय आजही माझे संजय जिवंत आहेत आणि ते कधीनकधी परतुन नक्की येतील.
पण सासरच्या साऱ्यांनी मात्र तेव्हाच संजय 'मृत' झाले हे गृहीत धरलं, मी त्यांच्या घरात 'काळ्या पायांनी' आले होते ना; शेजार-पाजाऱ्यांनी, नातलगांनी 'वांझ' ठरवले होते.
संजय ज्यांच्यासाठी सीमेवर गेला होता, तो ज्यांच्यासाठी हरवला आहे, त्यांपैकी काही जणांनीच संजयच्या 'प्रिय  संज्योतिस' वांझ, काळ्या पायाची ठरवली होती, हे जर त्यांना समजलं असतं तर संजयनी लगेच माझ्याकडे धाव घेतली असती. पण त्यांना कळवण्याचा काहीच मार्ग नव्हता.
म्हणून आजपर्यंत त्यांची वाट पाहते आहे.
खात्री आहे एक दिवस संजय नक्कीच परततील.
आणि आज तू असा शांत बसून कसले संकेत देत आहेस ?
येतील का रे संजय परत ?
अरे, त्या टॅक्सीतुन ते कोण उतरते आहे ? उंच, बळकट देहयष्टी, गोरा वर्ण, पिळदार मिश्या, सैनिकी पोशाख ! अरे 'हे' नक्कीच संजय आहेत कि मला पुन्हा एकदा भास होतोय ? 
अरे हे काय, संजयच आहेत हे नक्की, अच्छा तर लब्बाडा ह्यासाठी शांत बसला होतास होय, आता तुही ओरड आणि तुझ्यासोबत मी ओरडणार 'कुक्कुड कुक'"©
 
 
 
 
 
          
      
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा